पनवेल प्रतिनिधी:
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रासह पनवेल आणि नवी मुंबईत उमटले आहेत. या विधानाचा निषेध करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज धीरेंद्र शास्त्रींच्या विरोधात आक्रमक ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
नागपूर येथील एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत चुकीचे भाष्य केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, महाराजांचा अपमान करणाऱ्या शास्त्रींनी जाहीर माफी मागावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.
आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या प्रतिमेला जोडे मारले आणि त्यांचा तीव्र निषेध केला. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “धीरेंद्र शास्त्रींचा धिक्कार असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
या प्रकरणी धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महाराष्ट्रात कार्यक्रम करण्यास बंदी घालावी, अशी आक्रमक मागणी पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.
ज्या कार्यक्रमात हे वक्तव्य झाले, तिथे भाजपचे नेते उपस्थित असूनही त्यांनी विरोध केला नाही, असा आरोप करत काँग्रेसने सरकारवरही ताशेरे ओढले आहेत.
या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला आहे. अशा चुकीच्या विधानांमुळे समाजात तेढ निर्माण होत असून, महापुरुषांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, नगरसेवक हरेश केनी, कुसुम म्हात्रे,श्रुती शाम म्हात्रे,शशिकला सिंह यांच्या सह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










