कन्नड (प्रतिनिधी)
तालुक्यातील माळीवाडा येथील श्री हनुमान मंदिरात आयोजित कलश व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. यावेळी आमदार संजना जाधव यांनी सोहळ्याला उपस्थित राहून श्री हनुमानाचे दर्शन घेतले व ग्रामस्थांशी संवाद साधला.
गेल्या काही दिवसांपासून माळीवाडा परिसरात या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काल्याच्या कीर्तनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल”च्या जयघोषात संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते.
सप्ताहाच्या सांगता समारंभाला आमदार संजना जाधव यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी मंदिर समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. “अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्यानिमित्त त्यांनी माळीवाडा ग्रामस्थांचे अभिनंदनही केले.
या सोहळ्यासाठी माळीवाडा येथील तरुण मंडळ, ज्येष्ठ नागरिक आणि समस्त ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.










