आजरा (प्रतिनिधी) :
समाजकारण, राजकारण, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे आजरा तालुक्याचे ज्येष्ठ नेते तथा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. श्री. जयवंतराव शिंपी (साहेब) यांनी ७४ वर्षे पूर्ण करून ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. १ मे या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रदीर्घ व प्रेरणादायी कार्याचा आढावा घेण्यात येत आहे.
शून्यातून उभा राहिलेला प्रवास :
१ मे १९५१ रोजी आजरा येथे त्यांचा जन्म झाला. वडील गुडोपंत शिंपी यांचा तांदूळ व लाकडाचा व्यवसाय होता. मात्र, लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्यावर संघर्षाची वेळ आली. मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला. वाचनाची आवड आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्वतःची वैचारिक जडणघडण घडवली.
ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंतचा प्रवास :
१९८४ साली ग्रामपंचायत निवडणुकीतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. १९९२ मध्ये ते आजरा ग्रामपंचायतीचे सरपंच झाले. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी त्यांना जिल्हा परिषदेवर संधी दिली.
१९९८ मध्ये ते जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती व पक्षप्रतोद झाले, तर २०१६ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
दूरदृष्टीचे निर्णय :
जयवंतराव शिंपी यांनी घेतलेले काही निर्णय राज्यासाठी मार्गदर्शक ठरले. सरपंच असताना ‘चौरस फुटा’नुसार घरफाळा आकारणीचे धोरण त्यांनी राबवले, जे पुढे राज्यभर स्वीकारले गेले. तसेच, आजरा साखर कारखाना अडचणीत असताना तो खासगी तत्त्वावर चालवण्याचा धाडसी निर्णय घेतला. सुरुवातीला टीका झाली असली तरी हा प्रयोग यशस्वी ठरला. २००१ मध्ये त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष म्हणूनही प्रभावी नेतृत्व केले.
शिक्षण व सामाजिक कार्य :
सध्या ते आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. शेतीसाठी पाणी योजना, ऊस उत्पादन वाढविणे यांसारख्या उपक्रमांतही त्यांचे योगदान लक्षणीय आहे.
७५ व्या वर्षात पदार्पण करतानाही त्यांचा उत्साह आणि कार्यतत्परता कायम असून, “सामान्यांच्या हितासाठी झटणारा नेता” अशी त्यांची ओळख आजरा तालुक्यात निर्माण झाली आहे. त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.









