आजरा (प्रतिनिधी) :
आरोग्य विभाग, पंचायत समिती आजरा यांच्या वतीने ‘माझं गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियान कार्यशाळा तसेच राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ‘टी.बी. मुक्त भारत’ अभियानात उल्लेखनीय यश मिळवलेल्या ग्रामपंचायतींचा गौरव सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम तहसीलदार कार्यालय, आजरा येथील सभागृहात संपन्न झाला असून, अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गाडे होत्या.
यावेळी मान्यवरांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘माझं गाव – आरोग्य संपन्न गाव’ या अभियानाची सविस्तर माहिती दिली. हे अभियान १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार असून, कुटुंब नियोजन, आरोग्य विषयक निकष आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार आहे.
३७ ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण :
आजरा तालुक्यातील एकूण ३७ ग्रामपंचायतींनी क्षयरोग निर्मूलनात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ‘महात्मा गांधी’ यांचा पुतळा देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये –
सुवर्ण पुरस्कार : ०४ ग्रामपंचायती
रौप्य पुरस्कार : १५ ग्रामपंचायती
कांस्य पुरस्कार : १८ ग्रामपंचायती
मान्यवरांची उपस्थिती :
कार्यक्रमास उपसभापती सौ. यशोदा पोवार, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य विकास चोथे, समीर पारधे, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी सुभाष सावंत तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे स्वागत बी.एन.ओ. श्रीमती मनीषा भांडकोळी यांनी केले. डॉ. रवींद्र गुरव यांनी प्रास्ताविकातून अभियानाचे उद्दिष्ट स्पष्ट केले, तर शेवटी आरोग्य सेवक कौस्तुभ पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
या सोहळ्यास तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











