मोखाडा : महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी ग्रामसभा घेणे बंधनकारक असताना तालुक्यातील डोल्हारा गावात ग्रामसभा आयोजित करण्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शासनाच्या नियमांनुसार वर्षातून किमान चार वेळा ग्रामसभा घेणे आवश्यक असून त्यामध्ये १ मे रोजी ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. मात्र डोल्हारा ग्रामपंचायतीकडून या नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामसभेत गावाच्या विकासकामांवर चर्चा, विविध योजना, पाणीपुरवठा, रस्ते व इतर मूलभूत सुविधांबाबत निर्णय घेतले जातात. त्यामुळे ग्रामसभा न झाल्याने नागरिकांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली नाही.
दरम्यान,नियमांचे पालन न करणाऱ्या जबाबदारांवर कारवाई करावी, अशीही मागणी पुढे येत आहे.









