मोखाडा : तालुक्यातील डोल्हारा गावात पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून वायर जळाल्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
माहितीनुसार, पाणीपुरवठा योजनेतील वायरिंग वारंवार जळत असल्याने मोटार बंद पडते आणि पाणीपुरवठा खंडित होतो. यासोबतच मशीन चोरी, वायरिंग चोरी, विहिरीतील पंप चोरी, तांब्याच्या तारांची चोरी तसेच मीटर व फिल्टर चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. ग्रामविकास अधिकारी डोल्हारा यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित वायर अद्याप उपलब्ध नसून आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय असे सांगण्यात आले.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व तांत्रिक बिघाडांमुळे पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन आवश्यक साहित्य उपलब्ध करून दुरुस्ती करावी तसेच चोरी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.









