शहादा, दि. ०२ (प्रतिनिधी) – पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील मळी वाहून नेण्यासाठी तयार केलेली पाटचारी बेकायदेशीरपणे बुजविणाऱ्या विकासकावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. प्रशासनाकडे तक्रार दिल्यानंतर कारवाई होण्यापूर्वीच संबंधित विकासकाने रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या साहाय्याने भराव हटवून पाटचारी पूर्ववत केल्याने या प्रकरणात संशय अधिकच बळावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहिदा शिवारातील सर्वे नंबर ५९२ जवळील एका विकासकाने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सुमारे २०० मीटर लांबीचा मातीचा भराव करून पाटचारी बुजविली होती. यामुळे पुरुषोत्तमनगर, डोंगरगाव, आदिनाथनगर, महावीर नगर, पार्श्वनाथ नगर, मानस विहार नगर, छोरीया टाऊन आणि शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली होती.
या संदर्भात शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी, शहादा यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच, तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता.
मात्र, प्रशासकीय कारवाईपूर्वीच संबंधित विकासकाने रात्रीतून जेसीबीच्या साहाय्याने भराव काढून टाकत पाटचारी पूर्ववत केली. यासोबतच त्या ठिकाणी लावलेले फलकही हटविण्यात आल्यामुळे विकासकाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा पुन्हा देण्यात आला आहे.










