माळशिरस | प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध वाढत असून, या पार्श्वभूमीवर निमगाव येथे शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
नेवरी ते गारवड दरम्यान जाणारा हा प्रस्तावित महामार्ग बागायती पट्ट्यातून जात असल्याने अनेक शेतकरी बाधित होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. या “जुलमी” प्रकल्पाला ताकदीने विरोध करण्याचा सर्वानुमते निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत वक्त्यांनी सांगितले की, काही व्यक्ती शेतकऱ्यांना विविध आमिषे दाखवून जमिनी कराराने देण्यास प्रवृत्त करत आहेत. टक्केवारीचे आमिष दाखवून उभी पिके नष्ट केली जात असून, करार पद्धतीने आंबा लागवड करण्यास भाग पाडले जात आहे. ही योजना फसवी असून शेतकऱ्यांचे नुकसानच होणार असल्याचा इशारा देण्यात आला.
पंचायत समितीचे सभापती दत्ता भैया मगर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, “अशा फसव्या योजनांना बळी पडू नका आणि एकजुटीने विरोध करा.” यावेळी के. के. पाटील, हनुमंत पवार, संभाजीराव मगर यांनीही शेतकऱ्यांना संघटित होऊन आंदोलन उभारण्याचे आवाहन केले.
या बैठकीस ऍड. लक्ष्मण मगर, महादेव मगर, उत्तम पाटील, भारत मगर, उत्तम शेळके, दत्तात्रय मगर, विष्णुपंत मगर, महावीर मगर, सौरभ मगर यांच्यासह गारवड, चांदापुरी, वेळापूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रामभाऊ मगर यांनी मानले.






