मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : राज्यभरातील नागरिकांना शासकीय सेवा पुरवणारे महाऑनलाईन पोर्टल गेल्या दोन दिवसांपासून ठप्प असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांमधून मिळणाऱ्या महत्त्वाच्या सेवा पूर्णपणे बंद पडल्या आहेत.
दोन दिवसांपासून कामकाज ठप्प
सोमवारपासून पोर्टलवर लॉग-इन करताना अडथळे येत असून, मंगळवारी तर दिवसभर साईट सुरूच झाली नाही. यामुळे उत्पन्न, जात पडताळणी तसेच विविध शैक्षणिक दाखले मिळवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करूनही निराश परतावे लागत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी व मजुरांची आर्थिक हानी होत असल्याचे चित्र आहे.
विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली
स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरणे तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवणे अत्यावश्यक असताना पोर्टल बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मुदत संपण्याची भीती व्यक्त करत “दोन दिवसांपासून फेऱ्या मारतोय, पण ‘सर्व्हर डाऊन’ हेच उत्तर मिळते,” अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली.
सेवा केंद्र चालकही अडचणीत
पोर्टल बंद असल्यामुळे सेवा केंद्र चालकांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कामे प्रलंबित राहिल्याने केंद्रांवर गर्दी वाढली असून, तांत्रिक बिघाड शासनाचा असतानाही दोष मात्र केंद्र चालकांवर येत आहे.
दरम्यान, लवकरात लवकर हा तांत्रिक बिघाड दूर न झाल्यास नागरिकांचा संताप तीव्र होऊन आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








