सोनगाव (वार्ताहर) : राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे वाढत्या चोरी व दरोड्याच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने बंद पडलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा तात्काळ सुरू करावी, अशी मागणी माजी उपसरपंच किरण पाटील अंत्रे यांनी केली आहे.
किरण अंत्रे यांनी सांगितले की, मागील पंचवार्षिक काळात ही ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली होती. मात्र, शासनाकडे आवश्यक शुल्क न भरल्यामुळे सध्या ही यंत्रणा बंद पडली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सोनगाव व पंचक्रोशीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित झाल्यास गुन्हेगारांचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होईल, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असे त्यांनी नमूद केले. ग्रामपंचायतीने यंत्रणा अद्ययावत करून अधिक मोबाईल क्रमांक समाविष्ट करावेत आणि आपत्कालीन संदेश पाठवण्यासाठीचा क्रमांक प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावा, अशीही सूचना त्यांनी केली.
“ज्या पद्धतीने निवडणुकीच्या वेळी ग्रामपंचायत पदाधिकारी घराघरांत जातात, त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठीही त्यांनी पुढाकार घ्यावा,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुढील दोन दिवसांत ही यंत्रणा सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून ग्रामपंचायतीने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.











