धाराशिव (प्रतिनिधी) : कळंब तालुक्यातील नायगाव येथील भजनी मंडळाचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच ह.भ.प. भागवत हरिभाऊ शितोळे पाटील (वय ७२) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने नायगावसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भागवत पाटील हे धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते. भजनी मंडळाच्या माध्यमातून त्यांनी गावात भक्तीभाव जागवण्याचे काम केले होते. तसेच उपसरपंच पदावर असताना त्यांनी ग्रामविकासासाठीही योगदान दिले होते.
त्यांच्यावर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ह.भ.प. संदीपान महाराज हसेगांवकर, संजय पाटील दुधगावकर, माजी संचालक भरतराव पाटील, जि.प. सदस्य उद्धव बाजीराव शितोळे, प्रकाश नाडे आदी मान्यवरांसह भजनी मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने नायगाव परिसरात शोककळा पसरली आहे.









