
तिरंगा, संविधान आणि महापुरुषांच्या प्रतिमा घेऊन विद्यार्थ्यांचा संविधानिक मार्गाने एल्गार; तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन
शिरूर | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी ‘दिल्ली जंतर-मंतर आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला कृती समिती’च्या वतीने गुरुवारी (दि. २३) शिरूर येथे संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (मार्केट यार्ड) येथून मोर्चाला प्रारंभ झाला. तहसील कार्यालयापर्यंत संविधानिक मार्गाने शांततेत काढण्यात आलेल्या या मोर्चात विद्यार्थ्यांच्या हातात भारतीय तिरंगा, भारतीय संविधानाची प्रत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा तसेच विविध मागण्यांचे फलक होते. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “जय भीम”, “विद्यार्थ्यांचा आवाज – आमचा संघर्ष, अन्यायाविरुद्ध लढा आमचा हक्क” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
मोर्चात विविध सामाजिक संघटना, वकील, डॉक्टर, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांततापूर्ण आणि संविधानिक पद्धतीने पार पडलेल्या या मोर्चाने शिरूर शहराचे लक्ष वेधून घेतले.
राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन
तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार तसेच शिरूर पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर केले.
निवेदनात भारतीय संविधानातील अनुच्छेद १४, १९, २१ आणि ३२ चा उल्लेख करत अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार, संघटना स्थापन करण्याचा अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून न्याय देण्याची मागणीही करण्यात आली.
या प्रमुख मागण्या
निवेदनात दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीहल्ल्याची स्वतंत्र चौकशी, पोलीस अधिकाऱ्यांनी नावाच्या पट्ट्या काढल्याच्या प्रकरणाची चौकशी, विना वर्दीतील व्यक्तींकडून कथित हल्ल्याच्या आरोपांची चौकशी, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्याच्या घटनेची निष्पक्ष चौकशी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांची चौकशी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, महाराष्ट्रातील टीईटी पेपर लीक प्रकरणाची CBI/SIT किंवा स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी, राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा तसेच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनाला कृती समितीने पाठिंबा जाहीर केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संताप
मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी NET व इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी, शैक्षणिक व्यवस्थेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
मान्यवरांचे मार्गदर्शन
मोर्चानंतर झालेल्या सभेत माजी आमदार अशोकबापू पवार, रविंद्र धनक, डॉ. स्वप्निल भालेकर, डॉ. सुनिता पोटे आणि रमेश गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संविधानिक आणि लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश शिंदे यांनी केले, तर आभार डॉ. वैशाली साखरे यांनी मानले.
या शांतता मोर्चाच्या आयोजनासाठी अविनाश शिंदे, विशाल ससाणे, गणेश गोरखे, ॲड. हिमांशू गायकवाड, ॲड. मायाताई गायकवाड, विशाल जोगदंड, मुजफ्फर कुरेशी, ॲड. योगिता पाटील, सुवर्णा वाघमारे, डॉ. स्वप्निल भालेकर, डॉ. अखिलेश राजुरकर, डॉ. विशाल महाजन, डॉ. संतोष पोटे, डॉ. प्रवीण गायकवाड, डॉ. वैशाली साखरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
मोर्चाची सांगता भारतीय राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी तहसीलदार व शिरूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन सुपूर्द केले.
