कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास तुकाराम रावराणे यांची महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. कोकण महसूली विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
तुळशीदास रावराणे यांनी गेल्या २५ वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतंत्र मार्केट यार्ड नसतानाही त्यांनी पुढाकार घेत खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमीन खरेदी करून आधुनिक मार्केट यार्ड उभारणीस प्रारंभ केला. सध्या या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून बाजार व्यवस्थेत मोठा बदल घडविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शेतकरी हितासाठी राबविलेल्या विविध योजनांमुळे व उपक्रमांमुळे त्यांच्या कार्याची शासन स्तरावरही दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या या कामगिरीच्या पार्श्वभूमीवरच त्यांची महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर संचालकपदी निवड करण्यात आल्याचे मानले जात आहे.
या नियुक्तीमुळे कोकण विभागातील कृषी बाजार व्यवस्थेला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











