(प्रतिनिधी) : राज्यात सध्या उष्णतेची लाट तीव्र होत असून तिचा विपरीत परिणाम केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे, तर जनावरांच्या आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढत्या तापमानामुळे गाई-म्हशींसह इतर जनावरांमध्ये उष्णतेचा ताण झपाट्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पशुतज्ञ तथा माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी केले आहे.
डॉ. भिकाने यांनी सांगितले की, उन्हाळ्याच्या काळात जनावरांना उष्णतेचा त्रास अधिक जाणवतो. विशेषतः गाई या उष्णता कमी सहन करतात. योग्य वेळी काळजी व उपचार न केल्यास जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अगदी दगावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
उष्णतेमुळे दुधाळ जनावरांच्या उत्पादनावरही परिणाम होत असून दुधाचे प्रमाण दररोज कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांना थंड व सावलीच्या ठिकाणी ठेवावे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे, तसेच आवश्यकतेनुसार पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा.
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जनावरांची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून याकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.








