जळकोट (प्रतिनिधी) : जळकोट येथील बुद्ध विहारात दिनांक १ मे रोजी वैशाखी बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने बौद्ध समाजातील अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगाला शांती, करुणा आणि समतेचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हा सोहळा पार पडला. वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही पवित्र घटना घडल्यामुळे हा दिवस “त्रिगुणी पौर्णिमा” म्हणून विशेष महत्त्वाचा मानला जातो.
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी बुद्ध वंदना, धम्म वाचन आणि प्रार्थना करून शांतता व समतेचा संदेश दिला.
कार्यक्रमात बौद्ध अनुयायांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला असून जळकोट शहरात उत्सवी आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.









