गुहागर | प्रतिनिधी : निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गुहागर किनाऱ्यावर सध्या कचऱ्याचा विळखा पडत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढली असली तरी त्यांच्या निष्काळजीपणामुळे किनाऱ्यावर प्लास्टिकच्या बाटल्या, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, अन्नाचे डबे व इतर कचऱ्याचा साठा वाढत आहे.
पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत असली, तरी पर्यावरणाचा समतोल बिघडवणारी ही बाब गंभीर ठरत आहे. किनाऱ्यावरील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
स्थानिकांचा संताप
“‘आमचं गुहागर’ म्हणणारेच लोक हा कचरा पाहून दुर्लक्ष कसे करतात? निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक त्याच निसर्गाचा अनादर करत आहेत, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक येतात आणि त्यांच्या मागे कचऱ्याचा ढीग ठेवून जातात,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, ही समस्या केवळ गुहागरपुरती मर्यादित नसून देशभरातील अनेक पर्यटनस्थळांवर अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे “स्वच्छ पर्यटन” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासन, स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांचा संयुक्त सहभाग आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.











