शहादा, दि. 05 – शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अघोषित व वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने नगरपालिकेच्या पाणी टाक्या वेळेवर भरल्या जात नसल्यामुळे शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत शहादा नगरपालिकेतील बहुमतातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत थेट महावितरण कार्यालयावर धडक दिली. शहरातील एक्सप्रेस फिडरवरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली.
उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता यू. के. प्रसाद, सहायक अभियंता ए. टी. पाटील व शहर अभियंता पुष्पेंद्र पाडवी यांच्याशी कडक शब्दांत चर्चा केली. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी फोन उचलत नाहीत आणि समस्यांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप यावेळी करण्यात आला.
“जनतेला आम्ही काय उत्तर द्यायचे? शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी अखंडित वीजपुरवठा अत्यावश्यक आहे,” असे स्पष्ट मत नगरसेवकांनी व्यक्त केले. तसेच, वारंवार होणारी वीज खंडितता तात्काळ थांबवावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
नगरसेवकांनी महावितरण प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम देत १८ मेपर्यंत समस्या पूर्णपणे निकाली काढण्याची मागणी केली. अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावर महावितरण अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत ठराविक कालावधीत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई पाटील यांच्यासह नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, सुनील काशिनाथ पाटील, ललित छाजेड, हरीश पाटील, मुनेशचंद्र जगदेव, सागर मराठे, यशवंत पाटील, नगरसेवक प्रतिनिधी डॉ. चंद्रभान कदम, निलेशभाई पाटील, एकनाथ नाईक, विकी ठाकरे, गणेश पाटील, भाजपा पदाधिकारी अजबसिंग गिरासे, रमाशंकर माळी तसेच नगरपालिका पाणीपुरवठा अभियंता प्रकाश जावरे उपस्थित होते.











