कणकवली (प्रतिनिधी) – सत्ताधाऱ्यांची दडपशाही आणि आमिषांच्या राजकारणाला घाबरून न जाता त्याविरोधात ठाम आवाज उठवणारा प्रत्येक कार्यकर्ता शिवसैनिक बनला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विजय भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. नुकतीच जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले, “मी कोणत्याही अपेक्षेने जिल्हाप्रमुख पद स्वीकारलेले नाही. शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी ही जबाबदारी स्वीकारली आहे. संघटना एका दिवसात वाढत नाही, मात्र सातत्यपूर्ण प्रयत्नातून ती निश्चितच बळकट होते. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आला असून आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र या दडपशाहीला घाबरून चालणार नाही, संघर्ष करणे गरजेचे आहे.”
बैठकीदरम्यान ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
ज्येष्ठ शिवसैनिक आबू पटेल यांनी उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यासाठी योग्य नेतृत्व दिल्याचे सांगत संघटन विस्तारासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. जयसिंग नाईक यांनी भाजपवर टीका करत विरोधी पक्ष म्हणून ठाम भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सध्याच्या सरकारविरोधात जनतेत नाराजी असल्याचे सांगत गावागावात संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांनी वैभव नाईक यांनी पक्षनिष्ठा जपल्याचे कौतुक केले.
तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास तालुका संघटक राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











