शिरूर (पुणे प्रतिनिधी):
शिरूर नगर परिषद हद्दीत जनगणना २०२७ या राष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमास प्रारंभ झाला असून, यंदा ही जनगणना अत्याधुनिक व डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत आहे. नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून शहराच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांनी केले आहे.
नगराध्यक्षा यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले की, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून शहराच्या भविष्यातील विकास आराखड्याचा आधारस्तंभ आहे. केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारा निधी, पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षणाच्या योजना यांचे अचूक नियोजन जनगणनेतील माहितीवर आधारित असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची नोंद अत्यंत महत्त्वाची आहे.
स्वयं जनगणना (Self-Enumeration) – पहिला टप्पा सुरू
केंद्र शासनाने नागरिकांसाठी स्वयं जनगणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- १ मे ते १५ मे २०२६: नागरिकांनी स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवावी
- १६ मे ते १४ जून २०२६: प्रगणक (Enumerator) घरभेटी देऊन माहितीची पडताळणी करतील
प्रशासनाची तयारी पूर्ण वेगात
शिरूर नगर परिषदेकडून जनगणना कामासाठी सुसज्ज यंत्रणा उभारण्यात आली असून १०० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे.
मुख्याधिकारी तथा Census Charge Officer प्रीतम पाटील यांनी सांगितले की, “स्वयं जनगणना ही सोपी, जलद आणि सुलभ प्रक्रिया असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा.”
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
- अधिकृत संकेतस्थळ se.census.gov.in वर जाऊन माहिती भरावी
- प्राप्त SE ID सुरक्षित जतन करून ठेवावा
- प्रगणक घरभेटीवेळी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे
“माझी माहिती – माझ्या शहराचा विकास”
शिरूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक व संपूर्ण जनगणना अत्यावश्यक आहे. या राष्ट्रीय उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिरूर नगर परिषद प्रशासनाने केले आहे.











