कन्नड | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने नागद (ता. कन्नड) येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ अत्यंत उत्साहात पार पडले. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या समस्यांचे एकाच छताखाली निराकरण व्हावे, या उद्देशाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महसूल प्रशासनाची भक्कम उपस्थिती
या शिबिरासाठी कन्नडच्या तहसीलदार सारिका भगत मॅडम आणि उपजिल्हाधिकारी लता बागुल मॅडम यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंडळ नागद अंतर्गत येणारे सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि इतर संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
थेट संवाद आणि जलद कार्यवाही
प्रतिनिधी कृष्णा करंगळे यांनी शिबिराला भेट देऊन कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधला. शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी समजून घेऊन, त्या जागीच कशा सोडवता येतील यावर अधिकाऱ्यांनी भर दिला.
पारदर्शकतेवर अधिकाऱ्यांचा जोर
”शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शक पद्धतीने पोहोचावा हाच या शिबिराचा मुख्य हेतू आहे. नागरिकांनी अशा संधींचा लाभ घेऊन आपले प्रश्न मार्गी लावावेत,” असे आवाहन यावेळी सारिका भगत (तहसीलदार) यांनी केले.
ग्रामस्थांकडून कौतुक
या शिबिराच्या माध्यमातून विविध दाखले, संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज, नवीन रेशन कार्ड नोंदणी आणि जमिनीशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यात आले. प्रशासनाच्या या ‘अॅक्टिव्ह’ भूमिकेमुळे नागद परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून ‘सारथी महाराष्ट्राचा न्यूज’ कडे आपली प्रतिक्रिया देताना प्रशासनाचे आभार मानले आहेत.









