सेलू (परभणी) प्रतिनिधी – रवळगाव येथे मंगळवार, दि. ५ मे रोजी दुपारी कडब्याच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कडक ऊन आणि जोरदार वाऱ्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ सेलू नगर परिषद प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक दलाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परिसरातील इतर पाच कडब्याच्या गंजी आगीपासून वाचवण्यात यश आले. मात्र, या घटनेत शेतकरी भानुदास हरिभाऊ सरोदे यांची कडब्याची गंजी जळून खाक झाली असून सुमारे अडीच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या वेळी अग्निशामक दलातील कर्मचारी गणेश नवघरे, रवी अंभोरे आणि अनिकेत घेवारे यांनी तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले.
घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी कडबा व इतर ज्वलनशील साहित्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.










