कन्नड (प्रतिनिधी) :
उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कन्नड पंचायत समितीत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती तपासण्यात आली.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपातळी खालावल्यामुळे टंचाईची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांना पाण्याची अडचण होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. ज्या गावांमध्ये पाण्याची तीव्र कमतरता आहे, तेथील खासगी विहिरींचे तातडीने अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
तसेच ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेली कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीस पंचायत समिती सभापती सौ. सुप्रिया धुगे, उपसभापती सौ. माया सुरासे, तहसीलदार सारिका भगत, प्रभारी गट विकास अधिकारी विजयकुमार पंडीत तसेच संबंधित अधिकारी व सदस्य उपस्थित होते.
टंचाई निवारणासाठी प्रशासनाने तत्काळ व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी केली. या निर्णयामुळे आगामी काळात पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










