छत्रपती संभाजीनगर :
मोरेश्वर शिक्षण संस्था संचलित शांतीई प्राथमिक विद्यालय, बजाज नगर येथील शिक्षकांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी ठरले. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण आणि कार्यालयीन अधीक्षक प्रदीप राठोड यांनी शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
दि. ०६ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे सहशिक्षक रावसाहेब बोरसे, अजित जाधव, सागर सूर्यवंशी, रामेश्वर गोराडे, रवींद्र मगर, सचिन मुसळे आणि संभाजी जाधव हे गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणास बसले होते.
हे आंदोलन मराठवाडा शिक्षक संघाचे नेते भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले होते. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी शिक्षकांना लिंबूपाणी देऊन उपोषण सोडवले.
उपोषणकर्त्या शिक्षकांची मुख्य मागणी म्हणजे शाळेतील मुख्याध्यापकांनी नियमबाह्य पद्धतीने तुकडी वर्गाचा वाढीव टप्पा मूळ वर्गाला दिला असून, शासन निर्णयानुसार तो संबंधित तुकडी वर्ग शिक्षकांच्या पगारी खात्यावर जमा करावा, अशी होती. तसेच सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत अद्ययावत करून तात्काळ शिक्षकांना उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली होती.
शिक्षण विभागाच्या सकारात्मक भूमिकेमुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.




