काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या आसदमध्ये विद्यमान सरपंचांसह काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कडेगाव | प्रतिनिधी
“भारतीय जनता पार्टी ही कोणाची मक्तेदारी नसून कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सामान्य कार्यकर्त्यालाही मोठे पद मिळवून देण्याची ताकद भाजपमध्ये आहे,” असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.
कडेगाव तालुक्यातील काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सोनहिरा खोऱ्यातील आसद गावातील विद्यमान लोकनियुक्त सरपंच आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विकासकामांच्या भूमिपूजनाचाही कार्यक्रम पार पडला.
संग्रामसिंह देशमुख म्हणाले की, “२०१९ साली शिवसेनेने मतदारसंघ विकला नसता तर भाजपचा काम करणारा आमदार कसा असतो हे दाखवता आले असते. मी आमदार झालो असतो तर विरोधकांना या मतदारसंघात डोके वर काढता आले नसते.”
ते पुढे म्हणाले, “स्व. कदम साहेबांचे योगदान आम्ही नाकारत नाही. मात्र राज्यमंत्री म्हणून विरोधकांनी नेमके काय काम केले, हा प्रश्न आहे. शक्तीपीठ महामार्गावरून राजकारण केले जात आहे. सरकार शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही.”
आसद गावासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ८ कोटी रुपयांहून अधिक निधी दिल्याचे सांगत त्यांनी पुढेही गावाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अॅड. विशाल मोहिते, भाजपा तालुकाध्यक्ष विकास सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सम्राट महाडिक म्हणाले की, “आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्षाची संपूर्ण ताकद उभी राहील.”
या कार्यक्रमात आसद गावचे लोकनियुक्त सरपंच मोहन जगन्नाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद आंगवणे, किरण जाधव, उमेश भोकरे, आदिनाथ यादव, सौरभ धुमाळ यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
तसेच ताकारी योजना टप्पा क्रमांक ३ अंतर्गत वितरण रस्ता डांबरीकरण या विकासकामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास तानाजीराव जाधव, हरी जाधव, सतीश जाधव, बाळासो जाधव, भानदास जाधव, संभाजी जाधव, मारुती निकम, संदीप जाधव, उत्तम जाधव, भगवान मुळीक, अनिल मुळीक, पत्रकार संदेश जाधव, नितीन जाधव, प्रविण जाधव, हणमंत जाधव, डॉ. सुधीर जाधव, सचिन जाधव यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











