साळगाव (प्रतिनिधी) – आजरा तालुक्यातील निसर्गरम्य साळगाव येथे तब्बल १७ वर्षांनंतर ग्रामदैवत श्री लक्ष्मीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. हिरण्यकेशी नदीच्या काठावर वसलेल्या या गावात निसर्गसौंदर्य आणि भक्तीचा अपूर्व संगम अनुभवायला मिळत आहे.
चित्रा, हिरण्यकेशी नद्या आणि चित्री धरणाच्या पाण्यामुळे आजरा तालुका ‘सुजलाम-सुफलाम’ म्हणून ओळखला जातो. त्यातच हिरण्यकेशी नदीच्या कुशीत वसलेल्या साळगावचे सौंदर्य यात्रेच्या निमित्ताने अधिक खुलून दिसत आहे. नदीकाठी असलेले विठ्ठल-रखुमाई मंदिर, पुरातन वडाची झाडे आणि संथ वाहणाऱ्या नदीतील त्यांचे प्रतिबिंब पाहून भाविक मंत्रमुग्ध होत आहेत. रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे परिसर अधिकच आकर्षक दिसत आहे.
१७ वर्षांनंतर यात्रा होत असल्याने गावात उत्साहाचे वातावरण असून, पाहुणे-रावळ्यांनी संपूर्ण गाव गजबजून गेले आहे. घरोघरी नातेवाईक, मित्रमंडळींच्या भेटीगाठी रंगत असून गावातील वातावरण आनंदमय झाले आहे. यात्रेनिमित्त खेळणी, मिठाई, पाळणे आणि विविध दुकानांनी गावची वेशी फुलून गेली आहे.
भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे सुयोग्य नियोजन केले आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या यात्रेत कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. संपूर्ण गाव आणि मंदिर परिसर झगमगत्या रोषणाईने उजळून निघाला असून साळगावचे हे नयनरम्य रूप भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
निसर्गाची मुक्त उधळण आणि ग्रामदैवतावरील श्रद्धा यांचा सुंदर मिलाफ साळगावच्या या लक्ष्मी यात्रेत अनुभवायला मिळत असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.











