पिंगळी | प्रतिनिधी
पिंगळी गावातील गोपाळ समाज बांधवांच्या अथक परिश्रमातून उभारण्यात आलेल्या मंदिरात दिनांक ३ व ४ मे २०२६ रोजी ‘श्री राधा–कृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा’ भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक उन्मेषाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोहळ्यानिमित्त वेदघोष, पूजन, कीर्तन, भजन, प्रवचन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील तसेच दूरवरच्या गावांमधून भाविक आणि गोपाळ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्रोच्चार, ध्वजारोहण, कलश पूजन, देवतांची स्थापना व पूजन आदी धार्मिक विधी पार पडले. ३ मे रोजी सायंकाळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी शुभमुहूर्तावर श्री राधा–कृष्ण मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
या मंगलमय धार्मिक विधीसाठी वेदमूर्ती श्री वैजनाथ महाराज कंठाळे यांच्यासह विविध संत-महंतांची प्रमुख उपस्थिती लाभली. यामध्ये श्रीमंत १०८ गोपाळ गिरी आनंद गिरी महाराज (दतबर्डी संस्थान), सद्गुरू महंत मृत्युंजय महाराज (केदारनाथ संस्थान), परमपूज्य विरारदास महाराज (समिधा श्री कोंडलिंगेश्वर देवस्थान, शिवपुरी), सद्गुरू शिव चैतन्य शिवाचार्य महाराज (महादेव मठ संस्थान, हादगाव) तसेच निराधारजी महाराज (उदासीन पंचायत बडा आखाडा, उत्तर प्रदेश) यांचा समावेश होता.
या सोहळ्यात आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे सुपुत्र शिवराज पाटील कदम यांच्या हस्ते सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. ह.भ.प. श्री भिमराव महाराज सूर्यवंशी यांच्या काल्याच्या कीर्तनाने उपस्थितांना भक्तिरसात मंत्रमुग्ध केले. तसेच विविध भजनी मंडळांनीही आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
गोपाळ समाज बांधव आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने हा भव्य धार्मिक सोहळा यशस्वीपणे पार पडला. शेवटी गुरुवर्य शोभा माय यांच्या वतीने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवर, संत-महंत आणि भाविकांचा सत्कार करण्यात आला.











