गडचिरोली, दि. ६ (प्रतिनिधी) : गडचिरोली येथे उपचाराअभावी महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित डॉक्टरांवर केवळ निलंबन नव्हे तर थेट बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राहुल वैरागडे म्हणाले की, “ही घटना अपघात नसून आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणाचा थेट परिणाम आहे. अशा ढोंगी डॉक्टरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. केवळ निलंबन करून उपयोग नाही, तर बडतर्फीची कारवाई झाल्यासच इतरांना धडा मिळेल.”
ते पुढे म्हणाले की, आज अनेक शासकीय विभागांतील काही अधिकारी स्वतःला ‘राजा’ समजून सामान्य नागरिकांशी वागत आहेत. मात्र, हा देश लोकशाहीचा असून अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत, शासक नाहीत. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीव जात असतील, तर ते कदापि सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, दोषींना पाठीशी घालणे थांबवावे तसेच जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत तातडीने सुधारणा करावी, अशी मागणीही राहुल वैरागडे यांनी केली आहे.











