समुद्रपूर : नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच पोलीस प्रशासनाबाबत विश्वास वाढवण्यासाठी वर्धा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘संवाद’ उपक्रमांतर्गत गुरुवारी (दि. ७ मे) मोजा लष्मणपूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक Saurabh Kumar Agrawal प्रमुख उपस्थित होते.
सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात केवळ पोलीस विभागच नव्हे तर महसूल, पंचायत समिती, आरोग्य, कृषी, विद्युत, वन विभाग तसेच इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध समस्या मांडण्याची संधी उपलब्ध झाली.
यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ कुमार अग्रवाल यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत पोलिस विभागाशी संबंधित समस्या जाणून घेतल्या. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देत तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याचे आश्वासन दिले. पोलिस व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी (हिंगणघाट) श्री. सुशीलकुमार नायक, समुद्रपूर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी तसेच लष्मणपूर परिसरातील सुमारे २५० ते ३०० नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, समुद्रपूर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढलेले हरवलेले मोबाईल संच त्यांच्या मूळ मालकांना पोलिस अधीक्षकांच्या हस्ते परत करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले.
ग्रामीण भागात दर महिन्याला किमान चार गावांमध्ये ‘संवाद’ बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील तसेच युवक-युवतींचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.










