तांभा प्रतिनिधी :
तांभा ते विजयगोपाल मार्गावर वादळी वाऱ्यामुळे पडलेले मोठे झाड तब्बल एक महिन्यापासून रस्त्यावरच पडून असल्याने वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. संबंधित झाड अद्याप हटवण्यात न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामसेवक तसेच प्रशासक यांना चार वेळा याबाबत माहिती देण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता वाढली असून, एखादी दुर्घटना घडल्यास त्याला ग्रामसेवक, प्रशासक तसेच गटविकास अधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
तांभा ते विजयगोपाल हा मार्ग आधीच धोकादायक बनला असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यातच रस्त्यावर पडलेल्या झाडामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघाताचा धोका अधिक वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
सदर झाड तातडीने हटवून रस्ता सुरळीत करावा, तसेच खराब रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.








