प्रतिनिधी
पाताळगंगा (खोपोली), दि. ९ मे
छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत मंडळ अधिकारी तथा तहसील कार्यालय खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात उंबरे येथील प्रगतशील शेतकरी भरत जनार्दन साळुंखे यांना तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
खालापूर तालुक्यात औद्योगिक क्षेत्र झपाट्याने वाढत असतानाही शेती टिकवून ठेवत विविध प्रकारच्या पिकांद्वारे उत्पन्न वाढविण्याचे उल्लेखनीय कार्य भरत साळुंखे यांनी केले आहे. “झाडे जगवा, पर्यावरण वाचवा” हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली असून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे मोलाचे योगदान असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
साळुंखे यांनी शेतीत फळे, भाज्या, पालेभाज्या तसेच विविध पिकांची लागवड करून सेंद्रिय खतांचा वापर करत शेतीत सकारात्मक बदल घडवून आणला आहे. आधुनिक शेती पद्धती, कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
शेतकऱ्यांविषयीची आत्मीयता आणि शेती सुधारण्यासाठी केलेल्या विविध प्रयोगांची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमास परिसरातील अनेक शेतकरी, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








