भोसरी : प्रतिनिधी
भोसरीतील धावडे वस्ती परिसरातील पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली असून सिग्नलचे पालन होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः रॉंग साईडने धावणाऱ्या वाहनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे या ठिकाणी सतत ट्रॅफिक जामची समस्या निर्माण होत आहे. काही वेळा सिग्नल बंद अवस्थेत असतो, मात्र त्या वेळी वाहतूक पोलिसांचे नियंत्रण दिसून येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
यामुळे नागरिकांना rस्ता ओलांडताना तसेच वाहनाने प्रवास करताना भीती वाटत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पीएमपीएमएल व खासगी वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक विस्कळीत
पीएमपीएमएल बस तसेच खासगी वाहने भर रस्त्यात उभी केली जात असल्यामुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनत आहे. रस्त्यावर अव्यवस्थित पार्किंगमुळे ट्रॅफिक वाढत असून वाहनांना मार्ग काढताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे.

स्थानिक नागरिकांनी वाहतूक विभाग आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सिग्नल व्यवस्था सुरळीत करावी, वाहतूक पोलिसांची नियुक्ती वाढवावी तसेच रॉंग साईड वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.






