मोहोळ : प्रतिनिधी
राज्यातील लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला गती देत येत्या ३१ मे २०२६ पर्यंत शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण विभागामार्फत देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील लाखो उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
पहिली ते बारावीपर्यंतची रिक्त पदे भरणार
या भरती प्रक्रियेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विविध गटांतील रिक्त पदांचा समावेश करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी ‘पवित्र पोर्टल’वर जाहिरात नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
संस्थांसाठी कडक अटी लागू
भरती प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध करण्यासाठी शिक्षण विभागाने काही महत्त्वाच्या अटी लागू केल्या आहेत.
- जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी संस्थांना बिंदूनामावली (Roster) मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे.
- रिक्त पदांची माहिती संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांनी मान्य केल्यानंतरच जाहिरात पोर्टलवर प्रसिद्ध करता येणार आहे.
TAIT परीक्षेची आकडेवारी
मागील वर्षी घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेच्या आकडेवारीनुसार :
- नोंदणीकृत उमेदवार : २ लाख २८ हजार
- प्रत्यक्ष परीक्षा दिलेले उमेदवार : २ लाख ११ हजार ३०८
- स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेले उमेदवार : १ लाख ७० हजार १०८
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, मे २०२६ पर्यंत रिक्त होणारी संभाव्य पदे लक्षात घेऊन ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
उमेदवारांकडून स्वागत
“पवित्र पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास लाखो उमेदवारांना न्याय मिळेल. प्रशासनाने प्राधान्यक्रमाची संख्या वाढवावी तसेच पेसा (PESA) क्षेत्रातील भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील,” असे मत पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी व्यक्त केले.




