कुरुंदवाड (प्रतिनिधी):
कुरुंदवाड नगरपरिषदेने नुकतीच अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. त्यानुसार अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी अतिक्रमण काढण्यास सुरुवात होताच अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवली होती. मात्र प्रशासनाची कारवाई मंदावल्याने पुन्हा एकदा अतिक्रमणधारकांनी डोके वर काढले असून शहरात “येरे माझ्या मागल्या”ची स्थिती निर्माण झाली आहे.
याचा प्रत्यय महाराणा प्रताप चौक परिसरात पाहायला मिळत आहे. येथे पुन्हा फळगाड्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासन आणि रस्ते सुरक्षा पोलिसांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासन सॉफ्ट भूमिका घेत असल्याने अतिक्रमणधारकांमध्ये कोणतीही भीती राहिलेली नसून “आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही” अशा अविर्भावात ते वागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, वेळेत कठोर कारवाई न झाल्यास भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. “रोजचेच मढे, त्याला कोण रडे?” अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन अतिक्रमणधारकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.











