प्रतिनिधी :-
कुरुंदवाड :
माळभाग येथील महाराणा प्रताप चौकात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. कुरुंदवाड यांच्या गेटला अडकवलेली भारतीय डाक विभागाची जुनी टपाल पेटी आजही अस्तित्व टिकवून उभी असली, तरी तिची अवस्था “असून नसल्यासारखी” झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाईल आणि AI च्या आधुनिक युगात पत्रव्यवहाराची जागा डिजिटल माध्यमांनी घेतल्याने पारंपरिक टपाल सेवेकडे नागरिकांचा ओढा कमी झाला आहे. एकेकाळी “शांतीदूत” म्हणून गौरवली जाणारी पोस्ट सेवा आज केवळ मुख्य पोस्ट ऑफिसपुरती मर्यादित राहिल्याचे दिसत आहे.
कुरुंदवाडमधील महावितरण कार्यालयाच्या गेटसमोर लोखंडी खांबाला लटकवलेली ही टपाल पेटी अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत आहे. नागरिक तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे तर अनेक दिवसांनी पोस्टमन पेटी उघडण्यासाठी आला असता, कुलूपाची चावीही व्यवस्थित लागत नसल्याचे दिसून आले. उन्हाळा आणि पावसाळ्याचा मार सहन करत पेटीचे कुलूपही गंजलेल्या अवस्थेत आहे.
स्थानिक नागरिकांनी भारतीय डाक विभागाकडे या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. टपाल पेटीची दुरुस्ती करून तिला रंगरंगोटी करावी, नवीन कुलूप बसवावे तसेच नागरिकांना सहज दिसेल अशा ठिकाणी व्यवस्थित बसवावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा टपाल सेवेचा वापर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अन्यथा ही टपाल पेटी वर्षानुवर्षे गंजत राहून अखेर अस्तित्वातून नाहीशी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळेत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
“गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी…” अशी भावना आता अनेक जुन्या नागरिकांच्या मनात व्यक्त होताना दिसत आहे.











