शहादा, दि.12 (का.प्र.)
शाळा आणि महाविद्यालयांना जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर झाल्याने पुणे-मुंबईकडे शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी तसेच रोजगारासाठी स्थायिक झालेली कुटुंबे आता आपल्या मूळ गावी परतू लागली आहेत. मात्र, प्रवाशांच्या वाढलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी भाड्यात मोठी वाढ करून प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराईचा हंगाम साधून सुरू असलेल्या या मनमानी कारभारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सध्या राज्यभर उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईचा हंगाम सुरू असून, शहादा तालुक्यातील अनेक कुटुंबे रोजगार आणि शिक्षणासाठी पुणे-मुंबईसारख्या शहरांत वास्तव्यास आहेत. सुट्ट्यांमुळे ही कुटुंबे गावाकडे परतत असताना खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे.
एरवी शहादा ते पुणे किंवा मुंबई प्रवासासाठी ६०० ते ८०० रुपये भाडे आकारले जात असताना, सध्या प्रवाशांकडून १४०० ते २००० रुपयांपर्यंत भाडे घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, तिकीट मिळवण्यासाठी अनेक दिवस आधी बुकिंग करावे लागत असून, “गाड्या फुल्ल आहेत”, “मोजकीच तिकिटे शिल्लक आहेत”, “उद्या दर आणखी वाढतील” अशा कारणांनी भीतीचे वातावरण निर्माण करून जास्तीचे पैसे उकळले जात आहेत.
शहादा शहरातून पुण्यासाठी दररोज सुमारे १२ तर मुंबईसाठी ४ खासगी बसेसची ये-जा होत असते. मात्र, सर्वच ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून वाढीव दर आकारले जात असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना अनेक प्रवाशांनी सांगितले की, “उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे आम्ही गावाकडे निघालो आहोत. प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन सहकार्य करण्याऐवजी ट्रॅव्हल्स चालकांकडून दुप्पट-तिप्पट भाडे आकारले जात आहे. ही सर्वसामान्य प्रवाशांची आर्थिक लूट आहे.”
दरम्यान, पुणे येथील ॲड. जगदीश सोनवणे यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त करत, “उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे अनेक कुटुंबे गावी परतत आहेत. या संधीचा फायदा घेऊन नियमबाह्य भाडेवाढ करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ आणि कठोर कारवाई करणे आवश्यक आहे,” अशी मागणी केली आहे.









