शहादा, दि.12 (का.प्र.)
शहादा ते मंदाणे मार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसतानाच आज डोंगरगावजवळ झालेल्या भीषण अपघातात कवळीथ येथील ५३ वर्षीय रावण हंबर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. सहा दिवसांपूर्वीच कवळीथ गावातील एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावण पाटील हे शहादा येथे काम आटोपून दुचाकी क्रमांक एमएच १८ टी ५१२२ ने दुपारी सुमारे १२ वाजता आपल्या कवळीथ गावाकडे परतत होते. यावेळी डोंगरगावजवळील खडी मशीनसमोर केळी भरून शहादाकडे येणाऱ्या मालवाहतूक पिकअप क्रमांक एमएच ३९ एडी २४११ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून वाहनाचे चाकही निखळून दूर जाऊन पडले. या भीषण अपघातात रावण पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच रस्त्यावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मृत रावण पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. एकाच आठवड्यात गावातील दोन व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने कवळीथ गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, शहादा-मंदाणे रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असतानाही सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
“अजून किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ आणि अपघातग्रस्त कुटुंबीयांकडून उपस्थित केला जात आहे.









