ठाणे : प्रतिनिधी
ठाण्यातील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील आझाद नगर, सॅन्डोझ बाग परिसरातील मुख्य रस्त्यावरील पदपथावर चक्क अनधिकृत गोठा उभारण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अतिक्रमणामुळे पदपथ पूर्णपणे बंद झाला असून पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांना नाईलाजाने वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
आझादनगर येथील ‘रिजन्सी बिझनेस पार्क’ समोर बांबू आणि ताडपत्रीच्या साहाय्याने हा गोठा उभारण्यात आला आहे. पदपथावर जनावरे बांधल्यामुळे परिसरात शेण, मूत्र आणि उरलेला चारा साचून राहतो. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रहदारीच्या मुख्य रस्त्यालगत जनावरे बांधणे हे जनावरांसाठीही धोकादायक आहे. एखादे जनावर अचानक बिथरून रस्त्यावर आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या गंभीर समस्येबाबत जागरूक नागरिकांनी ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त तसेच प्रदूषण नियंत्रण कक्षाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
नागरिकांनी पदपथावरील हा अनधिकृत गोठा तातडीने हटवून परिसर अतिक्रमणमुक्त करावा, जनावरांची सुरक्षित ठिकाणी रवानगी करावी तसेच आरोग्याचा धोका टाळण्यासाठी महापालिकेकडून त्वरित स्वच्छता व निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.
महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण विभागाने संयुक्त कारवाई करून या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या या प्रकाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.









