लातूर | दि. १३ मे २०२६
समग्र शिक्षा अभियान, जिल्हा परिषद लातूर अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरणासाठी वाहतूक व्यवस्थेचा शुभारंभ जिल्हा परिषद लातूरचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती मा. श्री. दयानंद सुरवसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती तृप्ती अंधारे उपस्थित होत्या.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील एकूण २ लाख ३१ हजार ४१६ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये मराठी माध्यमाचे २,०४,९०३, सेमी इंग्रजी माध्यमाचे १८२ आणि उर्दू माध्यमाचे २६,३३१ विद्यार्थी समाविष्ट आहेत.
बालभारती विभागीय मंडळ, लातूर येथून पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर आणि त्यानंतर शाळास्तरावर पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
तालुकानिहाय पाठ्यपुस्तक वाटप
- लातूर – ८१,३०५
- अहमदपूर – २६,३०२
- औसा – २७,३६९
- निलंगा – ३०,७११
- उदगीर – ३६,८९५
- चाकूर – १६,३७४
- रेणापूर – १०,१८०
- देवणी – ७,६३५
- जळकोट – ८,५१३
- शिरूर अनंतपाळ – ६,१३२
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार यावर्षी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून नवीन अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेली पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.
या कार्यक्रमास बालभारती विभागीय मंडळाचे श्री. सचिन आलडवाड, भांडार व्यवस्थापक श्री. किशोर जाधव, सहाय्यक निर्मिती अधिकारी श्री. दीपक कुंभार, भांडार अधीक्षक श्री. दीपक गलांडे, रवी औसेकर, चेतन वाल्मिकी, श्री. चौळे यांच्यासह समग्र शिक्षा अभियान कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पाठ्यपुस्तक वितरणाचे संपूर्ण नियोजन समग्र शिक्षा अभियान कार्यालयामार्फत करण्यात येत असून श्री. सतीश भापकर, रऊफ शेख, श्री. चंद्रकांत ठाकरे, श्री. दत्तात्रय माळकर, श्री. सुनील राजुरे, श्री. गोविंद भोळे, श्री. योगिराज आमगे आदी अधिकारी-कर्मचारी या उपक्रमासाठी कार्यरत आहेत.
