लातूर प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (एसआयआर) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला असून, त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे. या मोहिमेंतर्गत लातूर जिल्ह्यातील सुमारे २० लाख ३६ हजार मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
बीएलओ करणार घरोघरी भेटी
या मोहिमेसाठी लातूर जिल्ह्यातील २ हजार १४२ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नियुक्त करण्यात आले आहेत. हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन तपशीलांची खातरजमा करतील. प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून नियुक्त करण्यात आलेले ‘बूथ लेव्हल एजंट्स’ (बीएलए) देखील सहकार्य करणार आहेत.
जनगणना आणि पुनरिक्षणाची सांगड
सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामाचा विचार करून विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ही प्रक्रिया जून २०२६ पासून सुरू होऊन ऑक्टोबर २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे.
लातूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे वेळापत्रक
- २० ते २९ जून २०२६ : बीएलओ प्रशिक्षण व पूर्वतयारी
- ३० जून ते २९ जुलै २०२६ : घरोघरी भेटी व माहिती संकलन
- ५ ऑगस्ट २०२६ : मसुदा मतदार यादी प्रसिद्ध
- ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ : दावे व हरकती स्वीकारणे
- ७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
राजकीय पक्षांना आयोगाचे आवाहन
भारत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलए नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. या प्रक्रियेमुळे दुबार नावे, मृत मतदारांची नावे वगळणे आणि नव्या पात्र मतदारांची नोंदणी अधिक अचूक व पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचे सांगण्यात आले.
विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार संख्या
- लातूर ग्रामीण – ३,३२,०११
- लातूर शहर – ३,९९,१०५
- अहमदपूर – ३,४५,३६०
- उदगीर (अ.जा.) – ३,२३,५६५
- निलंगा – ३,३३,३९१
- औसा – ३,०३,२०९
या विशेष मोहिमेमुळे मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
