अहिल्यानगर : प्रतिनिधी
राज्यासह अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून उद्यापासून उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता अहिल्यानगर प्रभाग क्रमांक १ चे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
दुपारच्या वेळेत सूर्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढत असून रस्त्यांवर उष्ण वारे वाहत आहेत. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच मजुरी व इतर कामांसाठी उन्हात फिरणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. सागर बोरुडे यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, “उष्णतेची ही लाट अत्यंत धोकादायक ठरू शकते. अनेक नागरिक उष्माघात, डिहायड्रेशन, चक्कर येणे, रक्तदाब वाढणे, अशक्तपणा आणि त्वचेच्या विकारांनी त्रस्त होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहून वेळोवेळी पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.”
त्यांनी नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे, हलके व सैल कपडे वापरावेत, डोक्यावर टोपी किंवा रुमाल घालावा तसेच लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारख्या पेयांचे सेवन करावे असा सल्लाही दिला. बाहेर उभ्या असलेल्या वाहनांमध्ये लहान मुलांना एकटे सोडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शहरातील रुग्णालयांमध्ये उष्णतेमुळे त्रस्त नागरिकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टरांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून शरीरात अशक्तपणा जाणवणे, सतत घाम येणे, डोके गरगरणे किंवा ताप येणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे सांगितले आहे.
अहिल्यानगर शहरातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन शेवटी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी केले आहे.










