शहादा, दि. १५ (प्रतिनिधी)
शहादा शहरातील दोंडाईचा रोडसह प्रमुख रस्ते आणि नवीन वसाहतींमधील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकेकाळी चांगल्या स्थितीत असलेले रस्ते आता मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापले असून, वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, अलीकडेच करण्यात आलेले काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणाचे रस्तेही उखडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याचा आरोप केला आहे.
दोंडाईचा रोड बनला ‘मृत्यूचा सापळा’
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बस स्थानक दरम्यानचा दोंडाईचा रोड सध्या अपघातप्रवण ठरला आहे. रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली लक्षात न आल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत असून काही वाहनधारक जखमीही झाले आहेत. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक बनले आहे.
नवीन वसाहतींतील रस्त्यांचीही दुरवस्था
शहरातील नव्याने विकसित झालेल्या वसाहतींमध्ये लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचे डांबर गत पावसाळ्यातच निघून गेले असून खडी उघडी पडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बस स्थानक या मुख्य मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी.
- केवळ डागडुजी न करता दोंडाईचा रोडसह इतर प्रमुख रस्त्यांचे नव्याने मजबुतीकरण करावे.
- निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी करून कारवाई करावी.
“मोठी जीवितहानी होण्याची वाट न पाहता पालिका प्रशासनाने तातडीने कामाला सुरुवात करावी,” अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, नगरपालिका प्रशासनाने समस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


