शहादा, दि. १५
“आजच्या युवकांनी चुकीच्या गोष्टींना बळी न पडता शिक्षण आणि अभ्यासाला प्राधान्य दिले पाहिजे. थोरामोठ्यांचा सल्ला घेऊन योग्य मार्गावर चालल्यास आपण समाजात आदर्श व्यक्ती म्हणून जीवन जगू शकतो,” असे प्रतिपादन शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवीताई मकरंद पाटील यांनी केले.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच सामाजिक समता पर्वानिमित्त युवकमित्र परिवार, नंदुरबार यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणिकभाई चौधरी, रमाशंकर माळी, अलकाताई जोंधळे, स्मिताताई सोनार, चंद्रमणी रायसिंग, वसीम शेख, प्रवीण महाजन आणि कल्पेश राजपूत उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते
खुला गट
- आरती पाकळे – प्रथम
- नयना माळी – द्वितीय
- पूनम वळवी – तृतीय
शालेय गट
- कार्तिका साळुंखे – प्रथम
- संजना शिरसाठ – द्वितीय
- श्रेया जमदाडे – तृतीय
स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
संस्थेचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कल्पेश राजपूत यांनी केले.











