अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शहादा, दि. १५
नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील सेवक व उपोषणकर्ते स्व. माणिक उद्धव निलेवाड यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्व. माणिक निलेवाड हे सन २००६ पासून नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात कार्यरत होते. २०२२ पासून ते कायम सेवा पदावर कार्यरत होते. सुरुवातीला त्यांना नियमित वेतन मिळत होते; मात्र काही महिन्यांपासून कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने त्यांचे वेतन बंद केले. या अन्यायाविरोधात न्याय मिळवण्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केले होते. उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
भोई समाज सेवा संस्थेच्या वतीने आरोप करण्यात आला आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचा अपमान करून त्यांना मानसिक त्रास दिला आणि आत्महत्येस प्रवृत्त केले. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
- स्व. माणिक निलेवाड यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर तातडीने नोकरी द्यावी.
- संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करावी.
- मृत्यूस कारणीभूत अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
- थकीत वेतन वारसांना एकरकमी अदा करावे.
या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुपडू खेडकर, इंजि. रामकृष्ण मोरे, जयंतीलाल खेडकर, अॅड. प्रकाश भोई, अशोक शिवदे, विवेक खेडकर, तुकाराम लांबोळे, आर.डी. मोरे, महेंद्र साठे, डॉ. गणेश ढोले, सुरेश वाडीले यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











