उपनगराध्यक्षा सौ. माधवी पाटील यांची मागणी
शहादा, दि. १५ (प्रतिनिधी)
शहादा शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक आणि अनियंत्रित पार्किंगमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने तातडीने संयुक्त आणि कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शहादा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. माधवी मकरंद पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीची मोठी कोंडी होत असून नागरिकांचे हाल होत आहेत. महात्मा फुले चौक ते श्रेयस हॉस्पिटल, स्टेट बँक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, चार रस्ता ते सोनार गल्ली तसेच महात्मा गांधी पुतळा ते बागवान गल्ली या भागांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे.
वन-वे नियमांचे उल्लंघन करून वाहनचालक सर्रास राँग साईडने वाहने चालवत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याशिवाय मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांची बिनधास्त ये-जा सुरू असल्याने प्रशासनाचा धाक उरला नसल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे, शहादा नगरपालिका कार्यालयासमोरच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली आहेत. या परिसरात नॉनव्हेज विक्रीच्या गाड्या आणि अंडाकरी विक्रेत्यांनी रस्त्यालगत व्यवसाय थाटल्याने अस्वच्छता, दुर्गंधी आणि गर्दीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर फळ विक्रेते, थंड पेय विक्रेते आणि इतर फेरीवाल्यांनी रस्त्यावरच दुकाने उभारल्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. व्यवसाय करण्याचा अधिकार सर्वांना असला तरी सार्वजनिक रस्ते अडवून नागरिकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे मत सौ. पाटील यांनी व्यक्त केले. प्रशासनाने अशा फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र नियोजित जागा निश्चित करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी डायमंड कॉर्नर परिसरातील बॅरिकेटिंगचे नियोजन पुन्हा तपासावे तसेच दुचाकी वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा. रस्त्याच्या एका बाजूस नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था सुरू करावी आणि पोलीस व नगरपालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून अवैध पार्किंग तसेच राँग साईड वाहतुकीवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
“अतिक्रमणमुक्त, शिस्तबद्ध आणि सुरक्षित शहादा ही काळाची गरज आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठे अपघात घडू शकतात,” असा इशाराही उपनगराध्यक्षा सौ. माधवी पाटील यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी शहादा पोलीस निरीक्षकांनाही देण्यात आली आहे.











