अतिक्रमण हटवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
फलटण | प्रतिनिधी :
फलटण तालुक्यातील काळज गावामध्ये सार्वजनिक रस्ते अडवणे आणि अतिक्रमणाचे प्रकार वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक पुढारी आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावातील पूर्वीपासून अस्तित्वात असलेला नांदल–काळज रस्ता बंद करण्याची तयारी काहींकडून सुरू असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. याशिवाय मोरेमळा रस्ता, डोंबाळवाडी शिवार रस्ता, गुंजाळमळा रस्ता तसेच खंडोबा मंदिराशेजारील रस्ता अशा अनेक ठिकाणी अतिक्रमण आणि रस्ते अडवण्याचे प्रकार सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या प्रकारांची माहिती गावातील पुढाऱ्यांना आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना असूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
रस्ते अडवण्याच्या घटनांमुळे गावात वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित अतिक्रमण तातडीने हटवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काळज गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.








