सोलापूर | प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे यांनी मांडलेल्या प्रस्तावाने जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत विशेष लक्ष वेधून घेतले. जिल्हा परिषदेसमोरील अतिक्रमित टपऱ्या हटवून त्याच टपरीधारकांसाठी नियोजनबद्ध गाळे बांधण्याचा पर्याय त्यांनी सभेत सुचवला.
शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती इंद्रजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी सदस्यांनी नवे विषय आणि उपाय सुचवावेत, असे आवाहन केले होते.
त्यास अनुसरून बोरामणी गटाचे सदस्य नेताजी खंडागळे यांनी मुख्यालय परिसरात सुमारे ७५ गाळ्यांचे बांधकाम करून ते विद्यमान टपरीधारकांना देण्याचा प्रस्ताव मांडला. यामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रस्तावावर चर्चा करताना संबंधित जागा प्रथम जिल्हा परिषदेच्या नावावर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे आणि कुलदीप जंगम यांनीही मुख्यालयाची जागा जिल्हा परिषदेच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले होते.
सभेत खंडागळे यांनी बोरामणी गटातील बहुतांश तांड्यांवर शिक्षकांची कमतरता असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. अनेक शाळा इमारती असूनही शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच वारकऱ्यांच्या सोयीसाठी उळे येथे कायमस्वरूपी शेड उभारण्याची मागणीही त्यांनी केली.










