
बदनापूर : प्रतिनिधी
पाणी फाउंडेशन व कृषी विभाग, बदनापूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपंचमीचे औचित्य साधून कृषीपुत्र शेतकरी गट, बाजार वाहेगाव यांच्या वतीने जलसंधारणाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. पावसाचा मोठा खंड, अनियमित पर्जन्यमान आणि आगामी काळातील पाणीटंचाईचे आव्हान लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून गटातील शेतकऱ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा उभारला.
या बंधाऱ्याची लांबी सुमारे ३० फूट, रुंदी ६ फूट आणि उंची ७ फूट असून, त्यासाठी दोन्ही बाजूंना सुमारे १३० गोणी रेतीने भरून रचण्यात आल्या. मध्यभागी सुमारे ३ फूट रुंदीची माती टाकून बंधारा तयार करण्यात आला. बंधाऱ्याच्या पाठीमागील भागात खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडवून साठवता येणार आहे.
या जलसंधारणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होऊन शेतीसाठी उपलब्ध पाणीसाठा वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
शेतकरी गटाचा उत्साह पाहून पाणी फाउंडेशनचे किशोर इंगळे सर तसेच F4Fचे तांबिले सर यांनीही वनराई बंधारा उभारणीसाठी सहकार्य केले. तसेच प्रगतशील शेतकरी व मास्टर ट्रेनर बळीराम काळे यांनी गटातील शेतकऱ्यांकडून विविध कृषीपूरक उपक्रम राबवून घेतले. यामध्ये दशपर्णी अर्काची फवारणी, जीवामृत फवारणी, चिकट सापळे आणि पक्षी थांबे बसविण्याचा समावेश आहे.
वनराई बंधारा उभारणीसाठी बळीराम काळे, जयराम लाखे, राजूभाऊ काळे, जयराम काळे, अमोल काळे, अनिल आरसूड, बाबासाहेब दिवटे, अशोक कवळे, मोहन तिवारी, ज्ञानेश्वर लहाने आणि माजी सरपंच अरुण काका काळे यांच्यासह शेतकरी बांधवांनी योगदान दिले.
शेतकऱ्यांनी श्रमदानातून उभारलेल्या या बंधाऱ्यामुळे जलसंधारणासोबतच सामूहिक प्रयत्न, सामाजिक बांधिलकी आणि शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण झाला आहे.




