प्रतिनिधी
किनवट : जून महिन्यापासून शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले विविध दाखले व प्रमाणपत्रे आतापासूनच काढून घ्यावीत, असे आवाहन किनवटच्या तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी जाहीर निवेदनाद्वारे केले आहे.
प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिक विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज करतात. त्यामुळे ऑनलाइन प्रणालीवर ताण वाढून तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने पालकांना वेळेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे.
तहसील कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, जून महिन्यात प्रवेशासाठी विविध प्रमाणपत्रांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासते. त्यामुळे पालकांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता, आवश्यक कागदपत्रांसाठी आतापासूनच ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज दाखल करावेत.
यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत दाखले उपलब्ध होऊन प्रवेश प्रक्रियेत होणारी धावपळ आणि अडचणी टाळता येतील, असेही तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी स्पष्ट केले आहे.








