पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, शगुन चौक, मेन कापड बाजार तसेच इतर प्रमुख रस्त्यांवर वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रहदारीला अडथळा ठरणारी अनधिकृत दुकाने, हातगाड्या आणि बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून वारंवार कारवाई केली जात असली तरी दुसऱ्याच दिवशी परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महापालिकेकडून वेळोवेळी धडक कारवाया करून रस्ते आणि फूटपाथ मोकळे केले जातात. मात्र काही तासांतच पुन्हा अतिक्रमणधारक त्याच ठिकाणी व्यवसाय थाटत असल्याने कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
विशेषतः बाजारपेठ परिसरात फूटपाथ पूर्णपणे गायब झाल्याने पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून अपघाताचा धोका देखील निर्माण होत आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, अतिक्रमण हटविण्यासोबतच संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई आणि नियमित देखरेख आवश्यक आहे. अन्यथा शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठा कायम अतिक्रमणांच्या विळख्यात राहतील, अशी भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, महापालिकेने अतिक्रमणांविरोधात सातत्याने मोहीम सुरू ठेवण्याचा दावा केला असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

