प्रतिनिधी | देवळी |
इंझाळा, ता. देवळी, जि. वर्धा | दि. १४ मे २०२६ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) अंतर्गत मौजा इंझाळा येथे मृदा व जलसंधारण (NRM) कामांचे पथदर्शी सादरीकरण आणि शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात जलदिंडीने करण्यात आली. “पाणी अडवा, पाणी जिरवा” हा संदेश देत शेतकरी बांधवांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. जलदिंडीमुळे गावात जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी पुलगाव येथील श्री. रितेश करोडे यांनी अल निनोचा हवामानावर होणारा परिणाम तसेच आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उप कृषी अधिकारी पुलगाव श्री. डी. एस. राठोड यांनी बीबीएफ (रुंद सरी-वरंबा) लागवड तंत्रज्ञानाचे फायदे आणि त्याचे महत्त्व स्पष्ट केले.
एनआरएम कॉर्डिनेटर श्री. प्रशांत काटकर यांनी जलतारा, शोषखड्डे आणि मृदसंधारणाच्या विविध कामांची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. पावसाचे पाणी शेतातच मुरवून भूजल पातळी वाढविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात अपूर्वा काटरपवार यांनी जलसंवर्धनावर आधारित भारूड सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच शेतकरी बंधू-भगिनींनी भजन आणि पथनाट्याच्या माध्यमातून जलसंधारणाचा प्रभावी संदेश दिला.
या कार्यक्रमाला समूह सहाय्यक कु. राधिका अडसोड, भारती सावरकर, अश्विनी डहाके, वनिता उईके, तसेच ढाक मॅडम, कृषी ताई शीतल भानखेडे, सुनीता लाकडे आणि बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना खैरकार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. कैलास मसराम यांनी मानले. कार्यक्रमाला इंझाळा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









